Friday, September 9, 2011

श्लोक पाचवा

जय जय रघुवीर समर्थ !

आता ब्लॉगर नव्या रुपात येऊ घातलाय आणि बऱ्याच प्रतीक्षे नंतर देवनागरीत लिहिणे शक्य झालेय. म्हणून मायबोलीत लिहितोय.

चला तर, आज श्लोक पाचवा पाहूया.

श्रीराम समर्थ श्रीराम | श्लोक पाचवा

मना पाप संकल्प सोडोनी द्यावा |
मना सत्य संकल्प जीवी धरावा ||
मना कल्पना ते नको विषयाची |
विकारे घडे हो जनी सर्व ची ची || श्रीराम ||

समर्थांनी अत्यंत मुलभूत गोष्टींना धरून इथे मनाला नम्र सूचना केली आहे. ते मनाला सुचवतात कि तु पाप संकल्प सोडावास आणि सत्य संकल्प जतन कारावास.

आता पाप हे असत्याचे प्रतिक आहे. जे सत्य नाही ते असत्य. जगात पंच महाभौतिक स्वरूपाचे जे निसर्ग नियम  आहेत त्या अन्वये जे काही प्राप्त आहे ते सत्य. या नियमांना छेद देऊन जे काही करण्याची इच्छा होते ते असत्य, तोच पाप संकल्प. आपला सनातन धर्म दुसरे तिसरे काही नसून या निसर्ग नियमाची म्हणजेच सत्याची नियमावली होय. 

सत्याचे विस्मरण म्हणजे माया. या माये मुळेच माणूस असत्याचा स्वीकार करतो. म्हणून दुसऱ्या ओळीत स्वामी म्हणतात हे मना, सत्याचा विचार, सत्याचे स्मरण म्हणजेच सत्याचा संकल्प सदैव जतन करून ठेव.

आता हे पाप आणि सत्य संकल्पाचे पथ्य नाही पाळले तर काय होईल? हे पुढल्या दोन ओळीत सांगितलेय. 'मना कल्पना ते नको विषयाची' याचा अर्थ हे मना तु सनातन सत्याला सोडून मायामय अशा इतर विषयांची, जे असत्य आहेत, इच्छा बाळगू नकोस. कारण असत्याच्या सेवनाने निसर्ग नियम मोडतील आणि त्याने कायिक, वाचिक, मानसिक व सांसर्गिक विकार (विकृती) निर्माण होतील.

जगरहाटी 'जगी वंद्य ते' मानणारी असल्याने त्यात तुझ्या ठाई निर्मिलेल्या विकृतींचा स्वीकार होणार नाही उलट तुझ्यावर छी थू  होईल. तु अस्वीकार्य अवमानित होशील. तेव्हा बापा, संकल्पांचे पथ्य पाळ आणि आपले भले करून घे.

नेहमी चांगले (सत्य) कर, वाईट (असत्य) करू नकोस त्याचे वाईटच परिणाम भोगावे लागतील हि 'आधी धरावा आचार, मग पाहावा विचार' यासाठी लागणारी मुलभूत सूचना समर्थ आपणास करून खऱ्या अर्थाने व्यवहार जागृती करतात.

जय जय रघुवीर समर्थ !

No comments: