Sunday, September 18, 2011

श्लोक ७

|| जय जय रघुवीर समर्थ ||

पाचव्या आणि सहाव्या श्लोकात अनुक्रमे पाप संकल्प व त्याचे परिणाम सांगितल्या नंतर श्री सदगुरू समर्थ रामदास स्वामी याउप्पर काय करावे ते यापुढील श्लोकांत सांगतात. वरील श्लोकात केलेल्या अभ्यासा नंतर स्वाभाविकपणे वाचकाच्या मनात एक अस्वस्थता जागृत होते. अशा अस्वस्थ परंतु जिज्ञासू मनाला स्वस्थ करण्यासाठी पुढील श्लोकांत उपदेश केलेला आहे.

श्लोक ७ वा : श्रीराम समर्थ श्रीराम

मना श्रेष्ट धारिष्ट जीवी धरावे |
मना बोलणे नीच सोशीत जावे ||
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसि रे नीववावे || श्रीराम ||

अस्वस्थ मनाला स्थैर्य देण्यासाठी समर्थ पहिल्याच ओळीत त्याला धैर्याचा उपदेश करतात. परिस्थिती बिकट असली कि मन त्याचे स्थैर्य सोडू पाहते. अशा वेळी श्रेष्ट असलेल्या धैर्याची कास मनाने धरली पाहिजे. हे धैर्य (धारिष्ट) श्रेष्ठ का आहे? कारण त्याच्या कडे डळमळीत झालेल्या मनाला पुन्हा आश्वस्त करून उभे करण्याचे सामर्थ्य आहे. तर हे मना तू सर्व प्रथम धीर धर.

अनेक दोषांचे उगमस्थान असलेल्या वाचा व बुद्धी यांना शमवण्याचे पर्याय समर्थ पुढे सांगतात. हे मना तू नेहमी सहनशील राहा. इतरांच्या कटू शब्दांचा तू धीराने, शांतपणाने आणि सोशिकतेने स्वीकार कर. कटू शब्दांचा तू असा स्वीकार केल्याने तुझ्या स्थैर्याचा भंग होणार नाही.

तसेच पुढीलांना बोलताना तू स्वत: नेहमी नम्र भाषेचा वापर कर. 

असे का? अशाने काय होईल? तर कटू शब्द धीराने ऐकून घेतल्याने तसेच आपण नम्र भाषेत बोलण्याने क्रोध, मद, मोह व मत्सर या दोषांचे दमन होईल व त्यांच्या परिणामा पासून आपण अलिप्त राहू शकू.

अशा प्रकारे अलिप्त झालेले मन आपल्या वाणीने इतरांना सुद्धा शांत करू शकते तथापि आपण सर्वांना निवविण्याचा (शांत करण्याचा) प्रयत्न करावा.

आपल्या अशा वर्तनाने आपला विवेक (चांगले वाईट ठरविण्याची व चांगल्याच्या स्वीकाराचा आग्रह धरणारी बौद्धिक क्षमता) जागृत होण्यास, बळकट होण्यास सुरुवात होते.

व्यवहारामध्ये या सोशिकतेचा आणि नम्र भाषेचा अत्यंत उपयोग होतो. हा स्वानुभव आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

1 comment:

Anonymous said...

|| जय जय रघुवीर समर्थ ||